नवी दिल्ली : करोनाच्या धोक्यामुळे जगभरात काय घडत आहे ते आपण सगळेच पाहात आहोत, मी देखील परदेशातून भारतात आलो आहे व विलिगीकरण कक्षात आहे. सध्याची सर्व परिस्थिती पाहता आता ऑलिम्पिक स्पर्धादेखील अन्य स्पर्धांप्रमाणे पुढे ढकलल्या जाव्यात असे मला वाटते, अशा शब्दात भारताचे माजी ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेता व प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
जपानमध्ये येत्या 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. आज करोनामुळे जगभरातील जवळपास 8 हजार लोक करोनाबाधित झाले असून अनेकांचा मृत्यूदेखील झाला आहे. अशा वातावरणात ही स्पर्धा आयोजित करण्याचा धोका पत्करणे योग्य नाही.
जगातील सर्वांचे आरोग्य अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. स्पर्धा काय पुन्हा कधीही घेता येतील आज केवळ लोकांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे व त्यालाच अनुसरून कृतीही होताना दिसली पाहिजे. जपानमधील स्पर्धेची तयारी अद्याप पूर्ण झालेली नाही.
स्पर्धेसाठी राबणारे हात ज्यांचे आहेत त्यांनाही करोनाची भीती आहे. मग स्पर्धा आयोजित करण्याचा हट्ट का अशी विचारणाही गोपिचंद यांनी केली आहे.
भारतच नव्हे तर जगातील सर्व देश करोनाशी दोन हात करण्यासाठी रात्रंदिवस लढत आहेत, त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. खेळाडूंचे आरोग्य धोक्यात घालून स्पर्धा भरविण्याची ही कोणती मानसिकता आहे, असेही गोपिचंद यांनी विचारले आहे.