पुणे – भूमी अभिलेख विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सुमारे 4644 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 17 जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सदर भरतीसाठी अर्ज भरताना अर्जदाराने संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून, समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपुर्वक व अचुक भरायची आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, अर्जदाराने शुल्क भरल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे. तेव्हा उमेदवारांनी शुल्क भरण्याआधी अर्ज काळजीपूर्वक पुन्हा पडताळून बघावा, कारण एकदा आपण शुल्क भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4 हजार 644 पदांच्या भरती जाहिरात 23 जून रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज 26 जून पासून सुरु आहेत. तसेच 17 जुलै ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी 1000 तर आरक्षण गटासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असेल. खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही 38 असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 आहे. २ तासाच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा 200 गुणांचा पेपर असणार आहे. या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याचबरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. https://mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या…