वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर देवाजवळ बसवले तर ते त्यालाही समजावून सांगायला सुरुवात करतील, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात पहिल्याच दिवशी मोदी यांच्यावर केली आहे. अमेरिकेतील तीन शहरांना भेट देण्यासाठी राहुल गांधी मंगळवारी सॅन फ्रॅन्सिस्को येथे पोहोचले. परदेशातील भारतीयांच्या कॉंग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि अन्य लोकांनी विमानतळावर राहुल यांचे स्वागत केले. त्यानंतर बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
देशात काही असे लोक आहेत की त्यांना वाटते की त्यांना सगळ्याच बाबींचे ज्ञान आहे. देवापेक्षाही आपल्याला जास्त माहिती असल्याचे त्यांना वाटते. ते देवासोबत बसतील आणि त्यालाही समजावतील. मला वाटते आमच्या देशाचे पंतप्रधान अशा लोकांपैकी एक आहेत. त्यांना जर ईश्वरासोबत बसवले तर ब्रह्मांड कसे काम करते हे ईश्वराला समजावून सांगण्यास ते सुरुवात करतील. ते शास्त्रज्ञांना विज्ञानाबाबत आणि इतिहासकारांना इतिहास शिकवू शकतात, अशा शब्दांत येथील भारतीयांसमोर बोलताना राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.
आपल्या “भारत जोडो यात्रे’बाबत बोलताना ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वी कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा मी केली. या यात्रेत माझ्या असे लक्षात आले की, भारतीय राजकारणात पूर्वी जी साधने होती ती आता काम करेनाशी झाली आहेत. लोकांना धमकावले जात आहे. तपास संस्थांचा दुरूपयोग सुरू आहे. अशा स्थितीत आता भारतात राजकारण करणे सोपे राहिलेले नाही.
भारत जोडो यात्रा रोखण्याचे शक्य ते सगळे प्रयत्न केले गेले. मात्र, यात्रेचा प्रभाव वाढतच चालला आहे. लोकांशी जोडले जाण्यासाठी जी काही साधने आहेत त्यावर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण आहे. त्यामुळेच भारत जोडो यात्रा सुरू केली गेली. तुमचा जर क्रोध, तिरस्कार आणि अहंकारावर विश्वास असेल तर तुम्ही भाजपच्या बैठकीत बसलेले असता, येथे नाही अशी टिप्पणीही राहुल यांनी केली.