इस्लामाबाद – सातत्याने शस्त्रसंधी भंगाच्या आगळिकी करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसल्याचे सूचित झाले आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला पाचारण केले. त्यावेळी त्या देशाकडून भारतीय जवानांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत रविवारी मारा केल्याचा कांगावा करण्यात आला.
भारताने शस्त्रसंधीचे पालन करून एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगत शांतता अबाधित ठेवावी, असेही त्या देशाने म्हटले. भारतीय जवानांच्या माऱ्यात दोन पाकिस्तानी नागरिक जखमी झाल्याचा दावाही पाकिस्तानने केला.
त्यामुळे पाकिस्तानी बाजूला हादरा बसल्याचे स्पष्ट झाले. खरेतर, पाकिस्तानी सैनिकच प्रथम शस्त्रसंधी भंग करून भारतीय हद्दीत मारा करतात. त्याला केवळ प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे.
त्या प्रत्युत्तरात तडाखा बसल्यावर पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंगाविषयी उलट्या बोंबा मारल्या जातात. भारतीय प्रत्युत्तरात मोठी हानी होत असूनही पाकिस्तान शस्त्रसंधी भंगाच्या आगळिकी थांबवताना दिसत नाही.