- नागरिक हैराण : रोज उकाडा आणि पाऊस
पिंपरी – गेली चार दिवस शहरात सायंकाळी पाऊस दमदार हजेरी लावत आहे. परंतु उकाडा देखील नागरिकांची पाठ सोडण्यास तयार नाही. सकाळी दहा वाजल्यापासूनच नागरिकांना तीव्र उकाडा जाणविण्यास सुरुवात होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसतात. परंतु उकाडा काही कमी होत नाही. त्यात थोडा जरी पाऊस पडला की महावितरणची यंत्रणा कोलमडते आणि घामाच्या धारा सुरु होतात. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. सप्टेंबरमध्ये नागरिकांना ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे.
खास करून पुणे, पिंपरी-चिंचवड, मध्य महाराष्ट्र, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि नाशिक या भागात मुसळधार पाऊस आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात देखील काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पाऊस मागील चार दिवसांपासून सरू असून आणि पुढील काही दिवस हा पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर यामुळे वातावरणातील उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसभर उन्हामुळे प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे शहरातील वातावरण झाले आहे. पावसाळ्यात देखील नागरिकांना फॅन सुरु ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यात खंडित होणारा वीजपुरवठा जास्तच त्रासदायक ठरत आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी आणि रविवारी (दि. 12, आणि 13) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. त्याचप्रमाणे 15, 16 आणि 17 सप्टेंबरलाही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात पाऊस सरू राहिल. तर शुक्रवारी (दि. 11) पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र स्वरुपाच्या पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
अडचणीत भर
गेली चार दिवस दररोज सायंकाळी पाचच्या सुमारास शहरात हजेरी लावणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याच्या घटना घडत आहेत. याशिवाय सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये देखील पाणी भरत आहे. शहराच्या सखल भागात साचणारे पाणी वाहनचालक आणि पादचाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. त्यातच स्ट्रीट लाइटचा खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विशेषत: दुचाकीस्वरांच्या अडचणीत भर पडत आहे. विकासाच्या नावाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेने शहरातील बहुतेक रस्ते खोदून ठेवले आहेत. यामुळे ठिकठिकाणी चिखल, पाणी साचणे अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.