मुंबई – भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी एक अजब विधान केले आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याची अजब माहिती दिली आहे. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे.
आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोकण महोत्सव आयोजनाच्या संबंधात पार्श्वभूमी विशद करताना छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचे बालपण कोकणात गेले ही त्यांची कर्मभूमी असल्याचे नमूद केले. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य नेत्यांनी टीकेची झोड उठवली.
त्यानंतर मात्र प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याच्या विधानाबद्दल दिलगीरी व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माझ्याकडून अनावधानाने दुसरा शब्द प्रयोग झाला. पण मी लगेचच चुकीची दुरूस्ती केली आहे. तथापि तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहे. स्वराज्याची मुहुर्तमेढ त्यांनी कोकणात रचली हे देखील विसरून चालणार नाही. आम्ही यापुढेही त्यांचा सन्मान ठेवणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. फेसबुक पोस्टवर त्यांनी ही दिलगीरी व्यक्त केली आहे.