Maharashtra Rain – संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर राज्यातील शेती पीकांचे मोठे नुकसान होत आहे. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश धरणांतील पाणीसाठा तळ गाठत आहे. अशातच आता हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात उद्या शनिवारपासून जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत. विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विजांसह जोरदार पाऊस होईल. या भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांधील काही भागांमध्येही जोरदार पाऊस होऊ शकतो. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
शनिवार (दि. 2), त्यानंतर रविवारी (दि. 3 सप्टेंबर) रोजीही पावसाचा अंदाज आहे. रविवारी विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला. हवामान विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होईल तर पुढे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान, राज्यात सध्या कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण होत आहे. शेतीतील खरीप हंगामातील कोरडवाहू शेतीतील पीकांनी माना टाकून दिल्या आहेत. पीके वाळून जात आहेत. राज्यातील अनेक भागात टॅंकरद्वारे पाणी पुरवण्याची वेळ आली आहे. चारा छावण्या सुरू करण्याचीही मागणी होत आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.