मुंबई – राज्यातील करोना संसर्गाचे वेग कमी होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळत आहे.
आजतर राज्यात दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पटीहून अधिक आहे. राज्यात दिवसभरात 4 हजार 237 जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 92.41 टक्के आहे. आतपर्यंत राज्यात 16 लाख 12 हजार 314 जण करोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आज 2 हजार 707 नवे करोनाबाधित आढळले. तर 105 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 85 हजार 503 ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत 45 हजार 914 जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.
दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली तरी करोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या प्रमाणानुसार जिल्ह्यातील रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्यांना दिल्या आहेत.
तसेच करोना आणि बिगरकरोना उपचारांचा मेळ साधण्यासाठी आधुनिक सुविधांसह उपचार विशेष (सुपर स्पेशालिटी) रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेशही सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. यामुळे अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.