नवी दिल्ली/ मुंबई –आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध मान्यवरांनी अभिवादन केले आहे. धरती आबा या नावाने प्रसिद्ध असलेले बिरसा मुंडा हे धरतीचे पिता होते त्यांना आदिवासी समाजाला एकत्र करुन ब्रिटीशांच्या सत्तेविरोधात लढा दिल्याचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाज क्रांतीचे जनक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. बिरसा मुंडा हे गरीबांचे खरे कैवारी होते. त्याचबरोबर त्यांनी दलित आणि शोषितांच्या उत्थानासाठी मोठे कार्य केले, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी झारखंडवासीयांना राज्याच्या निर्मितीदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळ सुरु केली.
त्यांनी आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आदिवासी समाजामध्ये चैतन्य निर्माण केले. स्वराज्याच्या घोषणेने इंग्रजांपुढेही आव्हान निर्माण केले होते. बिरसा यांच्या “उलगुलानञ या मुक्तीआंदोलनात हजारो आदिवासी सहभागी झाले होते असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी बांधवांना संघटीत करुन इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणारे शहीद बिरसा मुंडा समस्त देशवासियांसाठी दैवतासमान आहेत. असे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.