श्रीनगर – पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यांना लष्कराकडून रविवारी आदरांजली वाहण्यात आली. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग करून शुक्रवारी जो गोळीबार करण्यात आला. त्यात भारतीय हद्दीतील एकूण 11 जण ठार झाले होते.
त्यात एकूण पाच जवानांचा समावेश आहे. त्यातील चार जवान लष्कराचे आहेत तर एक जवान सीमा सुरक्षा दलाचा आहे. भारतीय सैन्य दलांच्या पाच जवानांसह भारतीय हद्दीतील इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.
लष्करातर्फे बदामी बाग येथे आयोजित कार्यक्रमात चिनार कॉर्पसचे कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू,आणि अन्य रॅंकच्या अधिकाऱ्यांनी लष्कराच्या चार जवानांना पुष्पांजली अर्पण केली.
हवालदार हरधनचंद्र रॉय, नाईक सताई भूषण रमेशराव गनर सुबोध घोष, आणि शिपाई श्रृषिकेश जोंधळे अशी शहीद झालेल्या चार जवांनीची नावे आहेत. त्यांना 13 नोव्हेंबर रोजी उत्तर काश्मीर मध्ये शत्रुसैन्याकडून झालेल्या गोळीबारात वीर मरण आले.