मुंबई – 2019साली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेत काही तासांच सरकार स्थापन केले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झाले होते, असे विधान त्यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्थिर सरकार हवे आहे, म्हणून आपण सरकार तयार करू. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला.
आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर सर्व गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता, असे फडणवीस म्हणाले.
तसेच अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितले तर मी सांगीन, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वात मोठा विश्वासघात हा पवारांनी नाहीतर उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आहे. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन, असेही त्यांनी सांगितले.
“देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची वक्तव्य करतील, असे मला कधीही वाटले नव्हते.”
– शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष
पुन्हा कलाटणी?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा काही अनपेक्षित घटना घडत आहेत. कॉंग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातांची जाहीर नाराजी प्रकरण समोर आले. त्यानंतर अजित पवारांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत थेट हल्ला केला नसला तरी उध्दव ठाकरे यांच्यापासून पृथ्वीराच चव्हाण यांच्या संदर्भात सूचक विधाने केली आहेत. एकप्रकारे महाविकास आघाडीचे नेतृत्व आपल्याडेच असावे अशी त्यांची पाउले पडतात का अशी शंकाही जाणकारांनी उपस्थित केली आहेत.
दादांच्या समर्थकांना त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सज्ज असल्याचे दावे सुरू केले आहेत. त्यावर शरद पवारांनीही लगोलग टिप्पणी करत कोणालाही काहीही वाटेल, मात्र तेवढी संख्या आपल्याकडे नसल्यामुळे याविषयी बोलणे मला योग्य वाटत नाही असे उत्तर दिले होते. तर राज्यातील सत्तासंघर्षाचा शेवटचा अंकही दिल्लीत न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा काही वेगळे घडू पाहते आहे का, अशी शंकाही डोकावू लागली आहे.