मुंबई – जगभरात येत असलेली करोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते. आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही. मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे आज राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, करोना संकटकाळात राज्यातील सर्वधर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून सहकार्य केले आहे. या पुढेही हे सहकार्य आवश्यक आहे. धूर आणि प्रदुषणामुळे करोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडे यश हे बेफिकीरीने वागून वाहून जाऊ शकते.
दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा. सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून करोनाला आत येऊ देऊ नये. दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलॅंडसारख्या देशात करोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यात हा विषाणु दुप्पट वेगाने वाढतो आहे. आपल्याला भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही. त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे. करोनाशी लढताना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
मास्क वापरणे बंधनकारक
राज्यात करोनाबाधितांची संख्या घटत असली तरी पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी. पण रुग्णसंख्या कमी होत असल्याने काही नागरिक मास्क न वापरत बेफिकीरीने वागत आहेत. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.