जळोची (बारामती) – जालना जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठी मारा केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आले असून सोमवारी (दि. 4) बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. “सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा’ अशा घोषणांनी बारामती दणाणून सोडली होती. तसेच सरकारच्या विरोदात मोर्चाही काढण्यात आला होता.
एकीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर अजित पवार यांनी काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. बुलढाणा आणि पिंपरी- चिंचवडमध्ये असलेला दौरा ऐनवेळी अजित पवार यांनी तब्येतीचे कारण देऊन रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलढाण्यातील जाहीर सभेत अजित पवारांनी दौरा का रद्द केला हे सांगावे लागले.
आता दुसरीकडे आमचे सरकार हे फेविकॉलच्या जोड सरकार असल्याचे सांगत आम्ही एकत्र असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा म्हणणे आहे. तसे असले तरी आता थेट बारामतीमधूनच अजित पवार यांना नागरिकांनी आव्हान दिल आहे.
मराठा बांधवांवर झालेल्या लाठीमारामुळे अजित पवार हे मात्र वेगळ्याच दुविधेत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच बारामतीकरांनी अजित पवार यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. आता तेच बारामतीकर सरकारच्या बाहेर पडण्याच आवाहन अजित पवार यांना करत असल्याने अजित पवार हे नेमकी काय भूमिका घेणार हे बघणे तितकेच महत्त्वाचे आहे.