राहुरी -मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारास सर्वस्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित नगर- मनमाड राज्यमार्गावरील चक्काजाम आंदोलनात ते बोलत होते. आ. तनपुरे म्हणाले की आजपर्यंत मराठा समाजाने शांततेत लाखो लाखोंचे मोर्चे काढले.
मराठा समाज शांतताप्रिय, सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यास सर्वस्वी गृहमंत्री जबाबदार आहेत. लाठीमार करणारे सरकार हे ब्रिटिश सरकार आहे की काय असा प्रश्न पडला आहे.सकल मराठा समाजाला मागणीप्रमाणे त्वरीत आरक्षण मिळालेच पाहिजे. आम्ही आंदोलका समवेत आहोत. आमच्या मराठी बांधव भगिनींचे रक्त सांडले आणि त्याचा आम्ही निषेध करतो आहोत यात राजकारण कसले आले असा प्रश्न त्यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले, मराठा आंदोलकांवर लाठीमारा केलेल्या या सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल. समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. येत्या निवडणुकीत त्यांना मतदार त्यांची जागा मराठा समाज निश्चितपणे दाखवेल. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकरी,सर्वसामान्य जनता,मराठा समाजाला वेठीस धरले जात आहे. मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे यांनी सरकारचा निषेध केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर- मनमाड रस्त्यावर मराठा एकीकरण समितीच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी, मुस्लीम समाज, जय भीम मित्रमंडळ, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उबाठा गट आदीं राजकीय पक्षांनी उपस्थित रहात पाठींबा दिला.
यावेळी सचिन म्हसे, मच्छिंद्र गुंड, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब आढाव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा एकीकरण समितीचे राजेंद्र लबडे, सतीष घुले, महेंद्र उगले, महेंद्र शेळके, अनिल आढाव, अशोक तनपुरे, रोहित नालकर, प्रशांत खळेकर, अविनाश क्षिरसागर, बलराज पाटील, राजेंद्र खोजे, सुनिल निमसे, ज्ञानेश्वर टेकाळे, संभाजी निमसे, विनायक बाठे, अनिल चत्तर आदी उपस्थित होते.
निवेदन तहसिलदार चंद्रजित राजपूत यांना देण्यात आले. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनाबाबत कौतूक
मराठा एकीकरण समितीने आंदोलना दरम्यान जास्त वेळ रास्ता रोको करून सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस न धरता प्रातिनिधिक स्वरुपात 15 मिनिटात रस्ता मोकळा करून दिला. तसेच राहुरी शहरातील व्यापारी पेठ बंद न करण्याची भूमिका घेत सामाजिक भान ठेवल्यामुळे सर्वस्तरातून मराठा एकीकरण समितीचे कौतुक केले जात आहे.