त्र्यंबकेश्वर – करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष थांबलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आज (दि. 13) दिंडीकरी, विणेकरी, मानकरी यांच्यासह हजारो वैष्णवांना सोबत घेवून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पहाटे नित्यनेमाने श्रींच्या समाधीस पुजा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिरात प्रस्थानची तयारी सुरु झाली. मुख्य मंदिराच्या सभामंडपात पालखी सजविण्याचे काम सुरु झाले. सुंदर फुलांनी पालखी सजविण्यात आली. मानकरी, विणेकरी व दिंडीप्रमुखांना प्रशासकांच्या हस्ते नारळ प्रसाद देण्यात आला.
समाधी मंदिरात प्रशासक राम लिपटे यांच्या हस्ते प्रस्थान पूजा करण्यात आली. त्यानंतर सच्चीदानंद गोसावी यांच्या हस्ते आरती करण्यात आली व सकाळी साडेदहा वाजता पादुका सुंदर फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झाल्या. पालखी खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीसह मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली.
सकाळी 11 वाजता प्रदक्षिणा पुर्ण करुन पालखी मुख्य मंदिरातून बाहेर पडली. त्यावेळी हजारो वैष्णव भक्तांनी विठ्ठल नामाचा गजर करीत पालखी खांद्यावरून रथाजवळ आणली. निवृत्तीदादांच्या दर्शनासाठी भाविकांनी यावेळी एकच गर्दी केली. यावर्षी प्रस्थान सोहळ्याला न भूतो न भविष्यंती अशी गर्दी झाली असल्याने या गर्दीला रोखताना पोलिसांचीही दमछाक झाली.
गतवर्षी अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाचे करोनाचे नियम पाळून हा प्रस्थान सोहळा साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र प्रस्थान सोहळ्याला प्रचंड गर्दी झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. हभप जयंत महाराज गोसावी यांनी प्रमुख मानकरी, दिंडीकरी व विणेकरांचा सन्मान प्रशासक राम लिपटे यांच्या हस्ते केला.
या प्रस्थान सोहळ्यास हभप भानुदास महाराज गोसावी, मोहन महाराज बेलापूरकर, संजय नाना धोंडगे, बाळासाहेब देहूकर, हरिप्रसाद देहूकर, सोपान बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, अर्जुन गाढवे, निवृत्ती चोपदार, रामकृष्ण लहवीतकर, गंगाराम झोले, संदीप मोलाणे यांच्यासह हजारो वारकरी, दिंडीकर उपस्थित होते.
हरिनाम गजरात सोहळा पहिल्या मुक्कामासाठी सातपूरकडे मार्गस्थ झाला. उद्या सोहळ्याचा नाशिक मधील नामदेव विठ्ठल मंदिरात मुक्काम राहिल.