कोल्हार (अहमदनगर) – नगर-मनमाड राज्यमार्गावरील कोल्हार येथील प्रवरेवरील दोन पुलांपैकी महिन्यापूर्वी पाडलेल्या एका पुलाचे काम रखडल्याने आता एकाच पुलावरून संपूर्ण वाहतूक सुरू आहे. याचा फटका प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांसह दुचाकीस्वार आणि पदयात्रींना बसल्याचे चित्र दिसत आहे.
शिर्डी आणि शिंगणापूर यांना एकत्र जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला नगर-मनमाड राज्यमार्ग आहे. त्यामुळे अवघ्या जगभरातील भाविकांनी या रस्त्याचा खूप वाईट अनुभव घेतला आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था जगभरात ज्ञात आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भाविकांचे अनेकदा अपघात झालेले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, या राज्यमार्गासंदर्भात नगरपासून मनमाडपर्यंत जवळपास पाच-सात आमदार-खासदार असलेल्या या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.
मात्र, खासदार सुजय विखे यांनी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवण्यात यश मिळवले असून, गेल्या चार महिन्यांपूर्वीच या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातदेखील झाली आहे. अनेक ठिकाणची अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरण, साईड गटार अशा कामांनी वेग घेतला. त्यानुसार कोल्हार येथील प्रवरा नदीवरील जुना पूल पाडण्यात आला. लवकरच जुन्या पुलाच्या जागेवर नवीन पूल होणार आणि कोल्हार खुर्द आणि कोल्हार भगवती गावांतील वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी गोड स्वप्न पडण्यास सुरुवात झाली. मात्र, या राज्यमार्गाचे सुरळीत सुरू असलेले काम रखडून पुलाचे कामही बंदच पडले.
त्यामुळे आता हे काम सुरू किंवा पूर्ण होईपर्यंत येथे असलेल्या एकाच पुलावर बोजा पडणार आहे. त्यातच आता शाळा सुरू झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आता या सर्व वाहतुकीतून रस्ता काढताना जीव मुठीत धरावा लागणार आहे. पर्यायी आपले पाल्य शाळेतून घरी येईपर्यंत पालकांचा देखील जीव टांगणीला लागणार आहे. त्यामुळे पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे.
जनता लोकप्रतिनिधींना जागा दाखवणार!
गेल्या काही दिवसांपूर्वी खा. सुजय विखे यांनी या रस्त्याचे काम टक्केवारीच्या कारणामुळे बंद पडल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अशा टक्केवारीखोर लोकप्रतिनिधींना येत्या विधानसभा आणि लोकसभेत या परिसरातील जनता त्यांची जागा नक्कीच दाखवणार असल्याचे मत पालक वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे.