मुंबई: राज्यातील करोनाशी संबंधित स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर राज्यातील नवीन उपाययोजनांची घोषणा 30 एप्रिलरोजी केली जाणार आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने संपर्क साधत आहेत. मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. मला या सर्वांचे आभार मानायचे आहेत.’ असे ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर 30 एप्रिल रोजी आपण नवीन उपाययोजना जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
करोनाविरोधातील युद्ध भारत औषधाच्या आधारे नव्हे, तर शिस्त आणि संयमाच्या आधारे जिंकणार आहे. औषध उपलब्ध होण्यापूर्वीच आपण हे युद्ध जिंकणार आहोत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाबाबत आपण केंद्र सरकारशी संपर्क साधून आहोत आणि जे काही करणे शक्य असेल, ते लवकरात लवकर केले जाईल. मात्र रेल्वेगाड्या सुरू केल्या जाणार नाहीत, हे निश्चित आहे. कारण यामुळे गर्दी होईल आणि परिणामी लॉकडाऊनला आणखीन वाढवावे लागेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात “कोविड-19’च्या रुग्णांची संख्या लपवली जात असल्याचे बोलले जात आहे. पण त्यात लपवण्यासारखे काहीही नाही. केंद्रीय पथक सर्व बाबींचा तपास करत आहे आणि राज्य सरकार त्यांच्याबरोबरच काम करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला डाळी आणि अन्य आवश्यक धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
राज्यातील 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. तर 20 टक्के रुग्णांमध्ये सौम्य, गंभीर आणि अतिगंभीर लक्षणे दिसत आहेत. महाराष्ट्रात 6 हजार रुग्ण आहेत. पण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देव देव्हाऱ्यात नाही…
आज अक्षय तृतीया आणि बसवेश्वर जयंती आहे. रमजान महिन्यालाही सुरुवात झाली आहे. या सर्व सणांबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. देव शोधण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. कारण या कठीण प्रसंगी इतरांची सेवा करणारे डॉक्टर, पोलीस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या रूपाने देवच काम करतो आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या कार्याचा गौरव केला.