पुणे – जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमारेचे प्रश्न सोडविण्याला हातभार लावावा. आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतिगृह संकुलाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठासारख्या संस्था करू शकतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रथम “डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत अदर पुनावाला यांना प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला, खासदार संजयकाका पाटील, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व आमदार विश्वजीत कदम, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यातील औद्योगिक प्रगती येथील शैक्षणिक विकासामुळे झाली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने पुणे राज्याचे उत्पादनाचे केंद्र आणि उद्योगांसाठी आकर्षण होऊ शकले. अदर पूनावाला म्हणाले की, मी कामाच्या निमित्ताने जगभर फिरतो पण जे प्रेम, संधी आणि सहकार्य भारतात मिळते ते अन्यत्र कुठेही नाही. त्यामुळे परदेशात जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मला सांगावेसे वाटते की तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारती विद्यापीठासारख्या दर्जेदार शिक्षण संस्था देशातच आहेत. त्यामुळे भारतात रहा आणि इथेच शिका असे आवाहन त्यांनी केले.
…तरच देशाची प्रगती – फडणवीस
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. पुढील 25 वर्ष आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यात चांगली शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली तरच आपण आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.