कडूस, (वार्ताहर) – दही आणि लाह्यांचे मिश्रण म्हणजे काला. तसेच शिव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याची अध्यात्मातून होणारी ज्ञानाची होणारी ओळख, श्रीकृष्णाच्या पौराणिक चरित्राच्या माध्यमातून हभप लक्ष्मण मुसळे महाराजांनी कडूस येथील काल्याच्या कीर्तनातून विषद करून आजही समाजाला विधायक कार्यासाठी एकीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
लाडके भक्त गंगाजीबुवा मवाळ यांच्या भेटीसाठी आलेले जगद् गुरू संत तुकाराम महाराज कडूस येथील कुमंडला नदी काठावरील ज्या वडाच्या झाडाखाली विसावले, त्याठिकाणी पुर्वीपासून लहानसे पादुका मंदिर होते. यावर्षी संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त प्रति पंढरपूर कडूस येथील सुंदर पादुका मंदिरांच्या जीर्णोद्धाराबरोबरच श्री विठ्ठल- रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भाविक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
यावेळी उपसरपंच रंजना पानमंद, अनिकेत धायबर, विजया नाईक, हेमलता खळदकर उपस्थित होते. यानिमित्ताने कै. दादासाहेब धायबर आणि काकासाहेब धायबर यांच्या प्रेरणेतून आयोजित हरिनाम सप्ताहात कडूस व परिसरातील नागरिक तन मन धनाने सहभागी झाले होते. परंपरेने पहाटेची काकड आरती, गाथा भजन, हरिजागर, हरिकिर्तन सेवा आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते.
शहाजी धायबर, बाळूतात्या धायबर, मोहन धायबर, फौजी शांताराम धायबर, विलास धायबर, रोहन धायबर यांच्या पुढाकाराने जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पार पडला.