सिनेसृष्टीत आज अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी इथे नाव, पैसा, ग्लॅमर मिळवलेले आहे; पण आजही त्यांच्याकडे पदवी नाहीये. ऐन तरुणपणात या क्षेत्रात आल्यानंतर इथल्या संघर्षातून फुरसत काढून त्यांना शिक्षण घेण्यास वेळच न मिळाल्यामुळे त्यांची शैक्षणिक कारकिर्द अर्धवट राहिलेली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जॉन अब्राहम, तापसी पन्नू, कृती सेनान, के. के. मेनन, परिणती चोप्रा यांसारख्या कलाकारांनी आपले शिक्षण पूर्ण करुन त्यानंतर चित्रपटाच्या क्षेत्रात पदार्पण केले.
सध्याचा आघाडीचा अभिनेता आयुष्मान खुराना यानेही मास कम्युनिकेशनमध्ये पदवी संपादित केलेली आहे. त्याच्या मते, चित्रपट व्यवसायाचे नीट आकलन होण्यासाठी शाळा-महाविद्यालयीन शिक्षण अत्यंत गरजेचे आहे. तो सांगतो की, मी सुरुवातीपासूनच शाहरुखचा फॅन आहे. त्याचबरोबर त्याला वाचनाची आवड असून तो देशविदेशातील सर्व प्रमख घटनाघडामोडींची माहिती घेत असतो.
शाहरुखकडे पाहून मला नेहमी वाटायचे की आपणही केवळ अभिनेता न बनता बुद्धिमान अभिनेता बनायचे. त्यामुळेच मी शैक्षणिक कारकिर्दीत गांभीर्याने अभ्यास केला. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये पहिला यायचो. माझ्या मते, शालेय शिक्षण कधीच वाया जात नाही. क्षेत्र कोणतेही असो त्याचा उपयोग होतोच.
शिक्षणामुळे आपली आकलनक्षमता, निर्णयक्षमता आणि दुनियादारी समजून घेण्याचे कौशल्य या सर्वच गुणांमध्ये निश्चितपणाने वाढ होते. इतकेच नव्हे तर शिक्षणामुळे सिनेजगताचे अर्थकारणही समजून घेणे सोपे पडते.