अरुण गोखले
आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी महाराज शूरसेन हे गेले दहा दिवस शत्रूशी प्राणपणाने लढत होते. पण तरीसुद्धा त्यांना त्या युद्धात पराभव पत्करावा लागला. स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी जंगलात जाऊन आश्रय घ्यावा लागला. या झालेल्या पराभवाने कधी नव्हे ते महाराज शूरसेन हे दु:खी कष्टी तर झाले होतेच शिवाय मनानेही खचून गेले. कारण शत्रूने नुसता त्यांचा पराभव केला नव्हता, तर त्यांचं राज्य, राजसिंहासन सारं काही त्यांच्यापासून हिरावून घेतलं होतं.
स्वत:चा जीव वाचवत महाराज आणि त्याचे काही निवडक सैनिक हे जवळच्याच रानावनात डोंगर गुफांचा आश्रय घेत फिरत होते. भटकता भटकता ते सर्वजण एका गुंफेपाशी आले. जवळपासच्या झाडांची फळे खाऊन आणि झऱ्याचे पाणी पिऊन त्यांनी त्या गुंफेतच काही काळ विश्रांती घ्यायचे ठरविले. शूरसेन एका भिंतीला टेकून बसला. राजा शरीराने आणि मनाने फारच थकला होता. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले होते. फितुरीमुळे झालेल्या पराभवाचे शल्य त्याच्या मनाला टोचत होते. त्याची उमेद मारली गेली होती. त्याच्या तलवारीला आलेलं अपयश पचवणं त्याला फार जड जात होत. त्याचा आत्मविश्वास डळमळला होता.
भिंतीला टेकून बसलेला राजा हताश नजरेनं इकडे तिकडे पाहत असताना त्याचं लक्ष समोरच्या एका भितींकडे गेलं. तिथं एक कोळी एक नाजूकसा आधार घेऊन जाळं विणत होता. एवढासा जीव, पण आपलं जाळं विणण्यासाठी त्याची चिवट झुंज चालू होती. जाळं विणण्याचं काम करत असताना कधी त्याचा अंदाज चुकत होता, कधी धागा तुटत होता, तर कधी तो स्वत: कोसळून खाली येत होता. पण प्रत्येक वेळी तेवढ्याच जिद्दीने, नव्या उमेदीने, दुप्पट जोमाने तो धाग्याने वर जात होता. प्रयत्न करत होता, नवा आधार शोधत होता. तुटलेला धागा जोडत होता. बराच वेळ झाला तरी त्याचं ते काम चालूच होत.
त्या एवढ्याशा जीवाचे ते अथक चाललेले प्रयत्न पाहून राजा मनोमन विचार करू लागला. जर हा एवढासा छोटा कीटक आपलं जाळं विणण्यासाठी इतके अथक प्रयत्न करतो आहे. क्षणोक्षणी येणाऱ्या अपयशाला जिद्दीने सामोरा जात आहे. तर मग मलासुद्धा असं खचून जाऊन कसे चालेल? काही झालं तरी मी एक माणूस आहे. मला या कोळ्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. मी पण नव्या ताकदीने, प्रयत्नाने, नव्या जोमाने, चिवट झुंज द्यायला हवी. मी देखील माझे गेलेले राज्य पुन्हा परत मिळवायला हवे. या नव्या विचाराबरोबर राजाच्या मनातले नैराश्य, दु:ख, वेदना यांचं मळभ दूर झालं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर त्या छोट्याशा जीवाकडून नवी प्रेरणा घेऊन राजा नव्या उमेदीने तिथून बाहेर पडला, आपलं राज्य पुन्हा मिळवण्यासाठी.