रावेत -रावेत येथील महापालिका जलउपसा केंद्राजवळ गेल्या काही महिन्यांपासून नदीपात्रात वारंवार मृत जनावरे, मांसाचे तुकडे, जनावरांची चरबी टाकण्याचे प्रकार होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा खळबळजनक आक्षेप थेरगाव सोशल फाउंडेशन या संघटनेने केला आहे. येथूनच संपूर्ण शहराला पणीपुरवठा होत असल्याने महापालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
थेरगाव सोशल फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महालिकेच्या वतीने रावेत येथे जलउपसा केंद्र उभारले आहे. त्याठिकाणावरून पाणी उचलून त्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या केंद्राजवळ नदीपत्रात वारंवार मृत जनावरे तसेच जनावरांची चरबी टाकल्याचे निदर्शनास येत आहे. हा प्रकार थेरगाव सोशल फाउंडेशनच्या निदर्शनास आल्यानंतर ते याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाण्यात टाकलेल्या मांसामुळे पाणी दूषित झाल्यास संपूर्ण शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नदीपात्राच्या दोन्ही बाजून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हा परिसर आपल्या निगराणीत ठेवावा. त्यामुळे पाण्यामध्ये काही अनुचित व विध्वंसक घटक मिसळण्याचे काम कोणाकडून होते हे समजेल. या निवेदनाची प्रत महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग व पर्यावरण विभागाला देण्यात आली आहे. या वेळी राहुल सरवदे, अनिकेत प्रभु, प्रकाश गायकवाड, गणेश डांगे आदी उपस्थित होते.