शेरखान शेख
शिक्रापूर – बातमीचा मथळा पाहून चुकल्यासारखे वाटते ना…? पण थांबा चुकले काहीच नाही.. सगळं काही बरोबर आहे… ते कसं, त्यासाठी ही बातमी वाचावी लागणार आहे. कारण आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिरूरच्या समाविष्ट असलेल्या 39 गावचे राजकारण याच भोवती चालत आल्याचे दिसतेय.
शिरूर तालुक्याचे दहा वर्षांपूर्वी शिरूर-आंबेगाव मतदारसंघात विभाजन झाले. यावेळी शिरूर तालुक्यातील 39 गावे आंबेगाव मतदारसंघाला जोडले गेली. त्यानंतर या गावातून सर्व राजकीय समीकरणे फिरू लागली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या 39 गावांच्या गणितातून राजकीय घडामोडी करण्यात राजकीय जाणकार व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या घडामोडीमधून शिरूर तालुक्यातील तीन घरांभोवती राजकीय समीकरणाची मजेशीर आकडेवारी फिरत असल्याचे समोर आले आहे.
शिरूर तालुक्यातील 39 गावे शिरूर – आंबेगाव मतदारसंघाला जोडली गेली आणि तालुक्यातील राजकारणात वेगळा बदल झाल्याचे दिसून आले. मात्र या 39 गावांतील राजकारण हे 3 घरांमध्ये फिरू लागले. या 3 घरांतून 9 पुढारी मुख्य राहिले आहेत. यामध्ये घरे 3 – पुढारी 9 असे 39 झाल्याचे दिसून येत आहे. 3 घरे म्हणजे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर आदी व्यक्तींची तीन घरे आहेत. याच तीन घरांतून प्रत्येकी 3 असे एकूण 9 पुढारी मुख्य भूमिकेत राहिले आहेत. तर या सर्व गावातून जिल्हा परिषदेचे गट देखील तीनच आहेत. यातील दोन घरांमध्ये सध्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.
माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे व घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे तर पवार कुटुंबातून बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा विकास मंचचे सदाशिव पवार व पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार तसेच पाचुंदकर कुटुंबातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, बाजार समितीचे माजी उपसभापती मानसिंग पाचुंदकर व जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर अशा प्रकारे नऊ पुढारी राजकीय भूमिका बजावत आहेत.
कोणतेही राजकारण अथवा कोणत्याही निवडणुका असल्यास 39 गावांतून या तीनही घरांचा विचार प्रामुख्याने करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर शिरूर-आंबेगाव मतदारसंघात कोणतेही मंत्री, नेते आल्यास या तीनही घरांतूनच त्यांचा पाहुणचार केला जातो. तर या 39 गावांना शिरूरच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. या तीन घरांना तसेच या तीन घरातील नऊ पुढाऱ्यांना विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे शिरूर-आंबेगाव मतदारसंघातील 39 गावांचे राजकारण तीन घराण्यांभोवती फिरत असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर-आंबेगाव मतदारसंघातील 39 गावे
पाबळ, खैरेवाडी, हिवरे कुंभार, धामारी, जातेगाव खुर्द, जातेगाव बुद्रुक, केंदूर, मुखई, करंदी, रांजणगाव गणपती, कारेगाव, बाभूळसर खुर्द, पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा, पिंपळे खालसा, बुरुंजवाडी, कोंढापुरी, कारेगाव, ढोकसांगवी, निमगाव भोगी, सोनेसांगवी, वाघाळे, वरुडे, मोराची चिंचोली, कान्हूर मेसाई, टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड, काठापूर खुर्द, चांडोह, वडनेर खुर्द, फाकटे, कवठे येमाई, सविंदणे, मिडगुलवाडी, मलठण, रावडेवाडी, निमगाव दुडे, आमदाबाद.
गणिताचे गुपित
शिरूर-आंबेगाव मतदारसंघाला जोडलेल्या 39 गावांचे गणित मजेशीर आहे. 39 म्हणजे 3 वर 9, त्यातील तीनमध्ये तीन महत्त्वाची घरे व या तीन घरांतील नऊ नेते म्हणजे तीनवर नऊ हे यामध्ये जडलेले गुपित असल्याचे याच 39 गावांतील एका जाणकार राजकीय व्यक्तीने सांगितले आहे.