काटेवाडी (गोकुळ टांकसाळे) – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडी ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरपंच पदासह सदस्य पदाच्या 15 जागा पैकी 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्री जय भवानीमाता पॅनेलला मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा काटेवाडी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.
काटेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जागांसाठी झाली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी दोन पॅनेलमध्ये लढत झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री जय भवानी माता पॅनलच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे पांडुरंग कचरे यांनी बहुजन ग्रामविकास पॅनेलचे आव्हान उभा केले होते.
या निवडणुकीमध्ये भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले असून एक उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत. सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मंदाकिनी दादा भिसे या निवडून आल्या असून त्या जनतेच्या मनातील सरपंच झाल्या आहेत.
मंदाकिनी भिसे यांना 2173 मते मिळाली असून भारतीय जनता पार्टीच्या ज्योती बापू भिसे यांना 1346 मते मिळाली आहेत तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार कमल बापू भिसे यांना 1036 मते मिळाली आहेत.
काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री जय भवानी माता पॅनेल मधून मिलिंद काटे, रुपाली मोरे, दिपाली काळे, प्रभाग क्रमांक दोन मधून – अजित काटे, जयश्री सुतार, गौरी गायकवाड, प्रभाग क्रमांक तीन मधून – अश्विनी घुले, जयश्री जाधव, प्रभाग क्रमांक चार मधून सागर मासाळ, आमिर पठाण, सुजाता देवकर, प्रभाग क्रमांक पाच मधून श्रीधर घुले, आनंद नामदास हे उमेदवार विजयी झाले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या बहुजन ग्रामविकास पॅनेल मधून प्रभाग क्रमांक तीन मधून अविनाश कवाळे हे विजयी झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक पाच मधून कोमल ठोंबरे या अपक्ष निवडून आल्या आहेत. मात्र अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले उमेदवार कोमल ठोंबरे यांनी विजयाची माळ गळ्यात घातल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 14 सदस्य झाले आहेत केवळ एक जागेवरती भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर काटेवाडी ग्रामपंचायत वर वर्चस्व मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरपंच पदाच्या उमेदवार व सदस्यांनी रॅली काढून जल्लोष साजरा केला.