ठाणे – ठाण्यासह पालघर, केडीएमसी, नवी मुंबईत राष्ट्रवादीनेही शिवसेनेशी आघाडी करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. आज राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय अवलोकन करण्यात आले. त्यानंतर एकमताने महाविकास आघाडी व्हावी, अशीच इच्छा व्यक्त करण्यात आली.
त्याचप्रमाणे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे आपापसात ठरविण्यात आले आहे. समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे काही नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप आहे. भाजप या शहरात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात वाढू द्यायची नसेल तर महाविकास आघाडी आवश्यक आहे, असे सर्वच अध्यक्षांचे मत आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे.
त्यासाठीच सर्व जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडी करण्याबाबत आपले मत नोंदविले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एक संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला ठाणे शहर-जिल्हाध्यक्ष तथा ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे, कल्याण-डोंबिवलीचे अध्यक्ष जगन्नाथअप्पा शिंदे, कल्याण-डोंबिवलीचे कार्याध्यक्ष वंडारशेठ पाटील, नवी मुंबई अध्यक्ष अशोक गावडे, उल्हासनगर अध्यक्ष पंचम कलानी, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, अंबरनाथचे अध्यक्ष सदामामा पाटील, बदलापूर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात एकत्र येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करीत भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवित आहेत. त्याचधर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण व्हायला हवे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
कारण, महानगर पालिका निवडणुकांनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन फार गरजेचे आहे. त्यामुळेच सर्वांनी एकमताने महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही महाविकास आघाडी सर्वांनाच फायद्याची ठरणार आहे, असे त्यांनी सागितले.