नवी दिल्ली – शिवसेना पक्षापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंधर्भात अनपेक्षित निकाल देताना शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का देताना अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यासाठी शरद पवार यांना ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेची वेळ देण्यात आली आहे.
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.
बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बहुमत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांनी २० जून रोजी निवडणूक आयोगात याचिका दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला होता आणि निवडणूक आयोगासमोर नऊ हजारांहून अधिक कागदपत्रे सादर केली होती. दुसरीकडे शरद पवार यांनी पक्ष सोडलेल्या ९ मंत्र्यांसह ३१ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती.
अजित पवार गटाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निकालानंतर देवगिरीवर आज अजित पवार गटाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार उपस्थित होते. बैठकीत निकाल आणि पुढील रणनीती, राज्यसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीसह छगन भुजबळ यांच्या नाराजीवर देखील चर्चा झाल्याचे कळते.
नार्वेकरही अपेक्षित निकाल देणार?
निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील १४ फेब्रुवारीला निकाल देण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निकालात अजित पवार गट व शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार असले तरी शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचा निकालासाठीही नार्वेकर निवडणूक आयोगाचा दाखला देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार गटासमोर मोठे आव्हान
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. जे नाव आणि चिन्ह दिले जाईल ते अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहचविण्याचे आव्हान शरद पवार गटासमोर आहे.
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
– अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे
– पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील
– दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
– ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले
– उद्या ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचवावे
– पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत
कोण कोणासोबत?
अजित पवारांसोबत कोण?
– महाराष्ट्रातील ४१ आमदार
– नागालँडमधील ७ आमदार
– झारखंड १ आमदार
– लोकसभा खासदार २
– महाराष्ट्र विधानपरिषद ५
– राज्यसभा १
शरद पवारांसोबत कोण?
महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा -३
निकालानंतर प्रतिक्रिया –
“आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत.”
अजित पवार, उपमुख्यमंत्री
“निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. न्यायालय आम्हाला न्याय देईल याची खात्री आहे.”
जयंत पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष
“निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्या समवेत आहेत. ती बाब निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आता सिद्ध झाली आहे.”
प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते