नवी दिल्ली – विधानसभेचे 42 आमदार, विधानपरिषदेचे 6 आमदार, नागालॅंडमधील 7 आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे प्रत्येकी एक खासदार अजित पवार गटाकडे आहेत. अजित पवार यांची 30 जूनला बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याबरोबर आहेत. विधानसभा, विधानपरिषदेचे अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे. अनेक वर्षापासून पक्षांर्तंगत निवडणुका झाल्या नाहीत, असा युक्तीवाद अजित पवार गटाने केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत पहिली सुनावणी आज निवडणूक आयोगासमोर पार पडली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी, तर अजित पवार गटाकडून मनिंदर सिंह यांनी जोरदार युक्तिवाद केला. ही सुनावणी दोन तास चालली. यानंतर पुढील सुनावणी सोमवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
अजित पवार गटाने सर्वात आधी जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला. शिवाय सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यामुळे आम्हीच खरा पक्ष आहोत, असा सर्वात मोठा दावा अजित पवार गटाने केला.
अजित पवार गटाने आमदारांच्या संख्येचा दाखला देताना नागालॅंडमधील आमदारांची संख्याही दाखवली. आमच्याकडे 55 आमदार आणि 2 खासदार आहेत, असा दावा अजित पवार गटाने केला. शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा सर्वात मोठा आक्षेप अजित पवार गटाने केला. दरम्यान, अजित पवार गटाचा युक्तिवाद सोमवारीही सुरू राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केला असल्याचे सुनावणीनंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. अभिषेक सिंघवी म्हणाले, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन मुद्दे उपस्थित केले. पहिला म्हणजे आमची बाजू ऐकून न घेता पक्षात वाद असल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असू शकतो. त्यामुळे आधी आमची बाजू ऐकून घ्या आणि मगच निर्णय जाहीर करा, असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे.
अजित पवार गटाचा युक्तिवाद
– 24 पैकी 22 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमच्या बाजूने हा शरद पवार गटाचा दावा खोडण्याचा प्रयत्न
– महाराष्ट्र आणि नागालॅंडचेही आमदार आमच्या बाजूने
– पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निघून गेल्याने आमदारांची संख्या हाच महत्त्वाचा मुद्दा
– जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर
– शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात
– शरद पवारांची अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर
शरद पवार गटाचा प्रतिदावा
– एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला, पण मूळ पक्ष आमचाच
– सर्वाधिक अधिकार शरद पवारांकडे असल्याने अजित पवार पक्षावर दावा करु शकत नाही