रायपूर – छत्तीसगढमध्ये दोन दिवसांत नक्षलवाद्यांनी चार ग्रामस्थांची हत्या केली. संबंधित ग्रामस्थ पोलिसांचे खबरे असल्याचा ठपका ठेऊन नक्षलींनी ते कृत्य केले. त्याशिवाय, काही ग्रामस्थांना नक्षलींकडून मारहाणही करण्यात आल्याचे समजते.
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात ग्रामस्थांकडून विकासकामांना आणि विशेषत: रस्तेबांधणीला वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे विकासाला विरोध असणारे नक्षलवादी बिथरले आहेत. त्यातून नक्षलवाद्यांनी दोन गावांमधील काही ग्रामस्थांना त्यांचे दडण्याचे ठिकाण असलेल्या जंगलात बोलावून घेतले. तिथे चार ग्रामस्थांची हत्या करण्यात आली. ग्रामस्थांवर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशातून नक्षलवाद्यांनी ते पाऊल उचलले.
नक्षलवाद्यांना स्थानिकांकडून मिळणारा पाठिंबा घटत चालला आहे. त्याशिवाय, नक्षलग्रस्त भागांत मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या नक्षलवाद्यांनी ग्रामस्थांवर अत्याचार सुरू केले आहेत.
तशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे मागील दोन महिन्यांत आढळून आले आहे. त्यामुळे सुरक्षा दले अधिक सतर्क झाली आहेत. त्यातून पावसाळा संपल्यानंतर नक्षलवादविरोधी मोहिमा आणखी तीव्र करण्याचे संकेत सुरक्षा दलांनी दिले आहेत.