पुणे – पीएमपी प्रशासनाने प्रवासी पासबाबत मुदतवाढ देण्यासाठी पासधारकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधन घातले आहे. पासधारकांनी दि.3 ते 10 सप्टेंबर या कालावधीत अर्ज आणि मूळ पाससह सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत पासची मुदतवाढ करुन घ्यावी, असे पीएमपीच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील प्रवासी यांना पासकेंद्रावर येणे शक्य नाही. त्यामुळेच पीएमपीचे नियम हे तर्कशुद्ध नसल्याचे सांगत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पीएमपीच्या प्रवासासाठी विविध संवर्गांअंतर्गत प्रवास पास काढण्याची तरतूद असून लॉकडाऊनपूर्वी अनेक नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह नियमित प्रवाशांनी पासेस काढले होते. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्याने पासचा वापर केला नाही. त्यामुळे प्रवाशांकडून पासला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी पीएमपीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील पासकेंद्र निश्चित केली आहेत. पासकेंद्रावर संबंधित पासधारकाचे मॅन्युअल आणि मी-कार्ड पाससह अर्ज स्वीकारून उर्वरित दिवसांसाठी त्याच पासवर मुदत वाढवून देण्यात येणार आहे. यासह कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नसल्याचे देखील पीएमपीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
काय म्हणतात प्रवासी…
अनलॉक असले तरी, नागरिक पूर्वीप्रमाणे सर्रास घराबाहेर पडत नाही. त्यामुळे एका ठराविक तारखेपर्यंत पासला मुदतवाढ देणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी मंचचे सचिव संजय शितोळे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नाही. यासह ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये परवानगी नसल्याने त्यांचे पैसे वाया जाणार का? त्यामुळे पीएमपीने ऑनलाइनचा देखील विचार करावा, असे ज्येष्ठ प्रवासी आशा शिंदे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील पास केंद्रांवर मुदतवाढ होणे शक्य नाही. मुदतवाढीसाठी किमान 60 दिवसांचा कालावधी द्यावा. केवळ 7 दिवसांच्या काळात पासधारकांनी शहरात येऊन मुदतवाढ व्हावी, यासाठी प्रक्रिया पूर्ण करायची का, असा सवाल प्रवासी दत्तात्रय फडतरे यांनी केला आहे.