शर्मिला जगताप
ऐतिहासिक नाटकांनी खऱ्या अर्थाने जागतिक रंगभूमी अधिक लखलखीत झाली. इंग्लिश ड्रामामध्ये जसे हॅम्लेट, ज्युलियस सिझर ही ऐतिहासिक नाटके गाजली त्याच धर्तीवर मराठीमध्ये शिवकालीन नाटकांनी रंगमंच गाजविला. अनेक पिढ्या रंगमंचावर नाटक जिवंत ठेवण्यास शिवकालीन नाटकं धावून आली होती. एकापेक्षा एक सरस मराठी लेखकांची फळीही ऐतिहासिक नाटकं लिहिल्यामुळे तयार झाली.
आग्य्राहून सुटका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक सोनेरी पान. राजकारण करीत असताना राजकीय डावपेचात अडकून शिवाजी महाराजांना आग्य्रास औरंगजेबास भेटीस जावे लागते. तेथे त्यांच्यावर डाव करून महाराजांना अटकेत ठेवले जाते. पण आपल्या बुद्धिचातुर्याने महाराज आग्य्राहून सुखरूप राज्यात येतात. ही ऐतिहासिक तशीच मनोरंजक घटना “गरूडझेप’ या नाटकात मांडली होती. मराठीतील प्रसिद्ध वसंत कानेटकर व रणजित देसाई या दोघा अव्वल लेखकांनी हे नाटक लिहिले होते.
ऐतिहासिक विषय व तोही शिवाजी महाराजांच्या जीवनातील असल्यामुळे नाटक पाहताना नावीन्य नसले तरी अंगात स्फूर्ती संचारते. पोवाड्याने नाटकाची सुरुवात होते. भराभरा कथानक पुढे सरकते. राजे मिर्झा यांची स्वराज्यावरील स्वारी-शिवाजीराजांची बेचैनी-शेवटी तहाचा निर्णय-राजांची शरणागती-मिर्झाराजे-शिवाजीमहाराज भेट.
त्यानंतर आग्य्राचा दरबार-औरंगजेबांचा रूबाब- या दरबारात महाराजांचा अपमान-महाराजांना कैद-महाराजांनी स्वतःची व आपल्या लोकांची करवून घेतलेली सुटका अशी विविध दृश्ये जिवंत वाटतात. महाराजांची भूमिका श्रीकांत मोघे यांनी साकारली होती. या नाटकाचे दिग्दर्शन दत्ता राम यांनी केले होते.