कराड -भारत सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जयवंत शुगर्सने नेहमीच ऊसउत्पादक शेतकरी सभासदांचे हित जोपासले आहे. कारखाना व्यवस्थापनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राध्यान्य देत आणि साखर उद्योगातील बदलत्या स्थितीचा अभ्यास करत नेहमीच उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे.
जयवंत शुगर्सने अल्पावधीतच साखर उद्योगात भरारी घेत साखरेबरोबरच अन्य उपपदार्थांची निर्मिती करत सातत्याने आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. साखर उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी जयवंत शुगर्सने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे.
नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन यांचे याबाबतचे पत्र नुकतेच कारखान्यास प्राप्त झाले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दि. 11 व 12 ऑक्टोबर रोजी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट व उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषद व “साखर एक्स्पो’ आयोजित करण्यात आले असून या परिषदेला विविध साखर उत्पादक देशांमधील 500 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे जयवंत शुगर्सच्या सर्वोकृष्ट कामगिरीवर राष्ट्रीय नाममुद्रा उमटली आहे. याबद्दल जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.