पुणे – मार्केटयार्डातील फळबाजारात नागपूर येथील संत्र्याचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत बाजारात दर्जानुसार संत्र्यांच्या 8 ते 10 डझनाच्या एका पेटीस 700 ते 800 रुपये, 11 ते 12 डझनाच्या पेटीस 600 रुपये, 14 डझन पेटीस 500 रुपये, 200 ते 250 नग 450 रुपये भाव मिळत आहे.
फळबाजारात नागपूर भागातून दररोज 8 तर 10 टन इतकी संत्र्याची आवक होत आहे. नागपूर, परतवाडा, अंजनगाव, अचलपूर, वरूड, चिखली, अमरावती या भागांतून संत्र्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाव आवाक्यात असल्याचे मार्केट याडार्तील व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. यंदा पाऊस हंगाम वेळेवर सुरू झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने संत्र्याचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत साधारणत: 10 टक्क्यांनी वाढले आहे.
सुरूवातीला बाजारात चार ते पाच टन इतकीच संत्रीची आवक होत होती. हंगामाच्या सुरूवातीला संत्री चवीला आंबट गोड होती. आता हंगाम बहरला असून बाजारात दाखल होत असलेली संत्री चवीला गोड असून त्याचा आकार आणि दर्जाही चांगला आहे. त्यामुळे संत्र्याला राज्य परराज्यांतील ग्राहकांसह घरगुती ग्राहक, ज्युस विक्रेते यांच्याकडून चांगली मागणी आहे. नोव्हेंबरपासून संत्र्याचा हंगाम सुरू होऊन, तो जानेवारी महिन्याअखेरपर्यंत संपतो.