नेवासा – गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत पाणीपुरवठा, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने शहराला आलेले बकालपण व कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेली उद्धटपणाची वागणूक यामुळे संतप्त नेवासेकरांनी आज तहसीलदार तथा नगरपंचायतीचे प्रशासक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. येत्या दहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपंचायत चौकात उपोषण करण्यात येईल, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला.
पिण्याच्या पाणीप्रश्नावर संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालय गाठले. या वेळी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांनी निवेदन स्वीकारले. शहरात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
शहरासह नगरपंचायत हद्दीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही पाणीपुरवठ्याबाबत कोणतीच सुधारणा झाली नाही. उलट जलवाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंची बिले काढण्यात आली. तरीदेखील पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणीपट्टी पूर्ण वर्षाची घेऊन पाणीपुरवठा पाच दिवसाला आणि तोही कमी प्रमाणात होतो. शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून व्याज लावून वसुली करण्यात व्यस्त आहेत. कर्मचाऱ्यांना विचारण्यासाठी गेले असता नागरिकांसोबत उद्धट वागणुकीत उत्तर दिले जाते. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास दि. 15पासून नगरपंचायत चौकात उपोषण करण्यात येईल, असाही इशारा निवेदनात दिला आहे.
या वेळी नगरसेवक संदीप बेहळे, रणजित सोनवणे, सतीश पिंपळे, दिनेश व्यवहारे, संदीप बेळे, गफूर बागवान, शांताराम गायके, जालिंदर गवळी, इमरान दारुवाले, आकाश गव्हाणे, ऋषभ ताठे आदी उपस्थित होते.
आ. शंकरराव गडाख यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सुमारे 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर केली. मात्र, सरकार बदलताच विविध विकास कामांसह पाणीयोजनेला स्थगिती देण्यात आली. सध्या नगरपंचायत प्रशासनाचा मनमानी कारभार वाढला असून, प्रशासनाविरोधात आता रस्त्यावर उतरणार आहोत.
संदीप बेहळे , माजी नगरसेवक