शिवसेनेचे लोणी येथे “होऊ द्या चर्चा’ अभियान
लोणी धामणी – निवडणुका जवळ आल्या की लोणी धामणी परिसरात ‘म्हाळसाकांत जलसिंचन योजना’ होणार व आंबेगाव पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार? असे आश्वासन गेली 35 वर्षांपासून लोक प्रतिनिधींकडून दिली जातात; मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी केली.
आंबेगाव -शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा ‘अभियानाला (दि. 4) सुरूवात करण्यात आली. पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात सर्वत्र या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी लोणी येथे ते बोलत होते.
आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी जारकरवाडी, धामणी, लोणी व इतर अनेक गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, आंबेगाव शिवसेना तालुकाप्रमुख मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, उपतालुकाप्रमुख महेश वाघ, महिला आघाडी तालुकाप्रमुख सुरेखा निघोट, विभाग प्रमुख सचिन लबडे, माऊली पाटील, संतोष पंचरास, विशाल बोऱ्हाडे, विकास गायकवाड तसेच लोणी धामणी परिसरातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी लोणी येथील बाजारात भेट देऊन शेतकरी, व्यापारी, नागरिक यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. समुद्रातले शिवस्मारक झाले का, दाऊदला आणले का, गंगा स्वच्छ झाली का, स्मार्ट सिटी झाल्या का, काश्मिरी पंडित घरी परतले का? मराठा, धनगर आरक्षण दिले का, अशा अनेक मुद्द्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा केली. दरम्यान संवाद साधत असतान सुरेश भोर यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. पंधरा लाख रुपये खात्यांत येतील, गॅसच्या किमती आवाक्यात येतील यांसह अनेक आश्वासने देण्यात आली; परंतु त्याची पूर्तता केली नाही.
पाण्यासाठी तीव्र आंदोलने होतील
सातगाव पठारावर कळमोडीचे पाणी येणार म्हणून शेतकऱ्यांच्या सातबारावर कळमोडीची शिक्के पडले; अद्याप पाणी मिळाले नाही. खेडचे लोकप्रतिनिधी सांगतात, रक्त सांडले तरी चालेल पण कळमोडीचे पाणी आंबेगावसाठी देणार नाही. डिंभे धरणाचे 51 टक्के पाणी इतर तालुक्यात, जिल्ह्यात जाते हेच डिंभे धरणाचे पाणी सातगाव पठार व लोणी धामणी परिसरास मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. पाण्यासाठी यापुढील काळात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भोर यांनी दिला.