टाकळी ढोकेश्वर – टाकळी ढोकेश्वरसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसात वासुंदे येथील नदी जोड प्रकल्पातून गाव तलावात पाणी पोहोचले. या प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेचे पोहोचल्याने हा नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला आहे. वासुंदे (ता. पारनेर) गावाच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या डोंगर उतारावरचे 70 टक्के पाणी हे मोठा प्रमाणावर वाया जात होते.
त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गावाचा पाणी प्रश्न बिकट होत असल्याने जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी या ठिकाणाची पाहणी करून वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग कसा करता येईल, याचा विचार करून नदी जोड संकल्पना गावातील काही ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने साकार करण्याचे ठरवले. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडून सदर कामासाठी अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजन मंडळाअंतर्गत नावीन्य पूर्ण योजनेतून सदर नदी जोड प्रकल्पासाठी पाच लाख रुपये मंजूर करून सदर योजना प्रत्यक्षात साकार केली.
पश्चिम दिशेला असणाऱ्या डोंगर उतारावरचे पाणी मोठा चर तयार करून ते गावच्या पाझर तलावाकडे वळविले. त्याचीच फलश्रुती म्हणून बुधवारी (दि.13) या डोंगराळ भागामध्ये पाऊस पडल्याने पाणी डोंगरावरून थेट नदी जोड प्रकल्पाद्वारे खोदण्यात आलेल्या चराने तलावाच्या दिशेने झेपावले.
तलावाच्या इतिहासात प्रथमच इतक्या कमी पावसात तलावात पाणी आले. कदाचित या वर्षी पहिल्या दोन पावसांतच तळे भरेल, असा अंदाज गावातील जाणकारांनी वर्तवला. तालुक्यातील दुसरा नदीजोड प्रकल्प झावरे यांच्या संकल्पनेतून वासुंदे येथे साकार झाला आहे. या अगोदर कापरी नदीवर नावीन्यपूर्ण योजनेतून पहिला नदीजोड प्रकल्प अवघ्या 25 लाख रुपयांचा खर्च करून यशस्वीपणे राबविण्यात आला. सदर योजनेसाठी झावरे यांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही गौरविण्यात आले होते.