उदगीर – जाणकार समीक्षकांनी माझ्या लेखनाची समीक्षा केली नाही याची खंत आहे; पण वाचकांनी मात्र सदैव साथ दिली, याचा आनंद-समाधान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी केले. 40 वर्षांचा लेखन प्रवास गवाणकर यांनी मनोगतात मांडला. त्या म्हणाल्या, लेखन प्रवासातून अनेक माणसे जोडता आली. मला कथा, कांदबरी लेखन नाही करता आले पण चरित्र लेखन भरपूर केले. यातून मला स्वतःला घडवता आले.
तसेच मोठया लेखकांचे जीवन चरित्र साहित्यामध्ये उमटावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘एक होता कार्व्हर’ या माझ्या पहिल्या लेखनास अनेक मोठया साहित्यिक, लेखक यांचा प्रतिसाद मिळाला हे माझे भाग्य आहे. सूर्यवंशी यांनी सांगितले की, पुस्तकाचे गाव करण्याप्रमाणे गाव तेथे ग्रंथालय केले जावे. सासणे म्हणाले, साहित्याला वाचकांची, वाचनाची ताकद असणे गरजेचे आहे.