उदगीर – आमच्या राजकारण्यांनी मराठी भाषेचा बळी देऊन ‘कोकणी’ ही गोव्याची राजभाषा केली. मराठी भाषेला टाळून कोकणी भाषेला हे स्थान देण्यात आले हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. मराठी भाषेला दुसरी भाषा म्हणून दर्जा द्यावा, अशी मागणी गोवा सरकारकडे करणार असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा केली जात आहे. प्रत्यक्ष त्यासाठी फारसे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत नाही. देशभरात दबदबा असलेले राजकीय नेते याबाबत आपले तोंड उघडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठीला आपण सर्वात मोठी भाषा मानत असू तर तिला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी दिल्ली पातळीवर ज्यांचे वजन चालणार आहे त्यांनी ते वापरले पाहिजे.
मराठी भाषेचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण्यांना घाबरून चालणार नाही. त्यांच्यासमोर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली तरच अनेक प्रश्न सुटतील. गोवा सरकारने मराठीचा द्वेष करणे सोडून दिले पाहिजे, अशी अपेक्षा ठाले पाटील यांनी व्यक्त केली.दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक गायकांच्या स्वागत गीताने झाली.
त्यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भारत सासणे यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगच्छ देऊन यथोचित सत्कार केला.संमेलनाचे मावळते अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडून भारत सासणे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.