मणिपूर – मणिपूरमध्ये मेईतेई समुदायाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीविरोधात 3 मे रोजी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनादरम्यान मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. त्यामुळे बुधवारी काही जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला. याशिवाय काही भागतील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. या दुदैवी घटनेनंतर भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.
मेरी कोमने ट्विट करत लिहिले की, “माझे राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा.” हे ट्वीट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूर मधील हिंसाचाराचे काही फोटो शेअर केले आहेत. हे ट्वीट मेरी कोमने मध्यरात्री 3:45 वाजण्याच्या सुमारास केले आहे.
My state Manipur is burning, kindly help @narendramodi @PMOIndia @AmitShah @rajnathsingh @republic @ndtv @IndiaToday pic.twitter.com/VMdmYMoKqP
— M C Mary Kom OLY (@MangteC) May 3, 2023
नेमकं काय घडलं?
मेईती समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी बुधवारी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान चुरचंदपूरमध्ये हिंसाचार झाला. यावेळी तोरबांग भागात आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. त्यानंतर राज्य पोलिसांसह लष्कराने रात्री उशिरा हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या परिस्थितीनंतर जिरीबाम, बिष्णुपूर, इम्फाळ पश्चिम, कक्चिंग, थौबल, आदिवास बहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल या 8 जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यासोबतच खबरदारी म्हणून पाच दिवस संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.