लखनौ: उत्तरप्रदेशातील बुलंदशहरामध्ये एका मंदिरात राहणाऱ्या दोन साधुंची एका इसमाने गांजाच्या नशेत हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जमावाकडून अलिकडेच दोन साधुंची आणि त्यांच्या गाडीच्या चालकाची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे.
त्यावरून महाराष्ट्र सरकारला घेरणारे आरोप भाजप नेत्यांकडून सुरू असतानाच आज नेमका उत्तरप्रदेश या भाजप शासित राज्यातच हा प्रकार घडल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागील आरोपांचा हिशोब चुकता करीत योगी सरकारला तिरकस भाषेत टोले लगावले आहेत. महाराष्ट्रातल्या घटनेबद्दल योगी अदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून संबंधीतांवर कडक कारवाईची मागणी केली होती. तसाच फोन आज उद्धव ठाकरे यांनीही अदित्यनाथ यांना करून त्यांनाही संबंधीतांवर कडक कारवाईची मागणी करून जुना हिशोब पुर्ण केला.
सोमवारी रात्री 52 आणि 35 वर्षांच्या साधुंची राजू नावाच्या एका आरोपींनी हत्या केली. या राजुवर या साधुंनी चोरीचा आरोप केला होता. त्या कारणाने त्याने ही हत्या केल्याचे सांगण्यात येते. राजूने भांग घेऊन हा प्रकार केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याने लाठीचा वापर करून बेदम साधुंना बेदम मारहाण करीत त्यांची हत्या केली. ईश्वरी इच्छेनुसार आपण हे कृत्य केले असा मारेकऱ्याचा दावा आहे असे पोलिसांनी सांगितले. या आरोपीला पोलिसांनी पकडले तेव्हा तो भांगेच्याच नशेखाली होता. या घटनेला कोणताही धार्िर्मक विद्वेषाचा रंग नाही आणि कोणी तसा देण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी संबंधीत जिल्ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची सुचना केली आहे.