महादेव जाधव
पुणे/फुरसुंगी, दि. 3 – उरूळीदेवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याचे आंदोलन ग्रामस्थांनी 15 ऑगस्टपासुन सुरू केले होते. तब्बल दिड महिना उलटला तरी याबाबत महापलिकेकडून कोणताच ठोस तोडगा, उपाययोजना करण्यात आलेली नाही. आता, कचरा डेपोवर कचरा टाकण्यास ग्रामस्थांकडून तिव्र विरोध होत असल्याने शहरात कचरा साचू लागला आहे. कचरा डेपोच्या प्रश्नावर पालिका प्रशासनाचा अजूनही तोंडावर हात आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या 27 वर्षांपासुन शहराच्या कचऱ्याची समस्या जैसे थे आहे. कचऱ्याच्या समस्येविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर प्रत्येकवेळी सहा महीने, नऊ महिने, वर्षाची मुदत पालिकेने वाढवून घेतली गेली आहे. तर, काही वेळा पोलिसबळाचा वापर करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही झाला आहे.
मात्र, राष्ट्रीय हरीत लवाद व प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला कचरा डेपो बंद तसेच ओपन डम्पींग करण्यासंदर्भात सूचना केल्यानंतर पालिका प्रशासन नमती भूमिका घेऊ लागले आहे. नागरी घनकचरा नियम 2000नुसार उघड्या जमीनीवर कचरा साचविणे गुन्हा असून कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्रक्रीया करणे गरजेचे आहे. परंतु, याच नियमांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
राष्ट्रीय हरीत लवादाचे निर्देशही पाळले जात नसल्याने ग्रामस्थांनी कचरा डेपो बंद आंदोलन सुरु केले आहे. सध्या, करोनाचे संकट गडद झाले असून यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेने तातडीने ठोस उपाययोजना करुन कचराडेपोची समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. नाहीतर करोना बरोबरच इतर रोगांच्याही साथी सुरु होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.
शहरातील कचरा का उचलत नाही…
कचराडेपोवर ओपन डम्पींग होत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले आहे. तर, ओपन डम्पींग होत नसल्याचा दावा पालिका अधिकारी करत आहेत. यात परस्परविरोधी भुमिका घेतली जात आहे. परंतु, पालिका खरे बोलत असेल तर शहर व उपनगरांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिग कसे काय साचत आहेत? हा कचरा का उचलला जात नाही? असा सवाल शहरातील नागरिक करू लागले आहेत.
एकही आश्वासन पूर्ण नाही…
फुरसुंगी-ऊरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले की, ओपन डम्पींग बंद करु, कचरा डेपो बंद करु, शहरातील चारही दिशांना कचरा डेपोचे विभाजन करु, पाणीयोजना करू, बायोमायनिंग करू, कचराडेपो बाधित मुलांच्या नोकरीचा प्रश्न सोडवू, दोन्ही गावांतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करू, फुरसुंगीचा जलशुध्दीकरण प्रकल्प पूर्ण करू, अशी अश्वासने पालिका प्रशासनाकडू देण्यात आलेली आहेत. परंतु, यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कोट-फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान कचरा डेपोविरोधात पुकारलेले आंदोलन करोनाच्या पार्श्वभुमीवर समंजसपणाची भुमिका घेत ग्रामस्थांनी स्थगित केले होते. त्यानंतर सहा महिने उलटले तरी पालिकेने कोणत्याच उपाययोजना केलेली नाही. बायोमायनिंग प्रकल्पाच्या नावाखाली कचराडेपोत ओपन डंपिंग राजरोसपणे सुरु होते. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी गेल्या दिड महिन्यांपासुन कचरा डेपो बंद आंदोलन सुरु केले आहे. आता, कचरा डेपोचा मार्ग प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही.
– भगवान भाडळे, अध्यक्ष, कचरा डेपो हटाव संघर्ष समिती