मुंबई : रणजी क्रिकेट स्पर्धेतील मुंबई विरूध्द मध्यप्रदेश ही लढत अनिर्णित राहिली. या लढतीत मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३ गुण मिळवले तर मध्यप्रदेशला १ गुणावर समाधान मानावं लागले. मुंबईचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. मुंबईचा सर्फराज खान सामन्याचा मानकरी ठरला.
Mumbai vs Madhya Pradesh – Match Drawn Mumbai took first innings lead #MUMvMP @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/zeIPY1Biu9
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 15, 2020
दरम्यान, मुंबईने सर्फराज खान (१७७) व आकर्षित गोमेल (१२२) यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात सर्वबाद ४२७ धावा केल्या होत्या. मध्यप्रदेशकडून गोलंदाजीत गौरव यादवने ४, कुलदीप सेनने ३, शुभम शर्माने २ गडी बाद केले.
त्यानंतर मुंबईने मध्यप्रदेशचा पहिला डाव २५८ वर संपवत १६९ धावांची मोठी आघाडी घेतली होती. मध्यप्रदेशकडून पहिल्या डावात व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ९३ धावा केल्या. मुंबईकडून अंकुश जयस्वालने ४ तर मुलानी, दीपक शेट्टी आणि राॅयस्टनने प्रत्येकी २ गडी बाद केले.
पहिल्या डावात मोठी आघाडी घेत मुंबईने दुस-या डावात आकम्रक फलंदाजी करत हार्दिक तामोरेच्या ११३ आणि शम्स मुलानीच्या ७९ धावांच्या जोरावर ५ बाद २३८ धावांवर डाव घोषित केला आणि मध्यप्रदेश समोर विजयासाठी ४०८ धावांचे आव्हान ठेवले होते. मध्यप्रदेशकडून गोलंदाजीत मिहीर हिरवाणीने ४ गडी बाद केले.
त्यानंतर दुस-या डावात मध्यप्रदेशने व्यंकटेश अय्यरच्या ५९(१२५), मिहीर हिरवाणीच्य् नाबाद ६९(१०६) आणि आदित्य श्रीवास्तवच्या नाबाद १३०(२८७) धावांच्या खेळीच्या जोरावर ११२ षटकांत ६ बाद ३१४ धावा करत सामना अनिर्णित राखला. मुंबईकडून दुस-या डावात राॅयस्टन, दीपक शेट्टी यांनी प्रत्येकी २ तर मुलानी आणि अंकुश जयस्वालच्या प्रत्येकी १ गडी बाद केला.