मुंबई – चालू आठवडयाचा प्रारंभाला शेअर बाजाराने करोनाची भीती न बाळगता तेजीची उसळी नोंदवली होती. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशीच्या व्यवहारात मात्र (बुधवारी, सोमवारी महावीर जयंतीमुळे बाजार बंद होता) शेअर बाजाराने तब्बल 1500 अंकांची तेजी पार करुनही अंतिम क्षणी बाजाराने मात्र निराशाजनक कामगिरी केली. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 173.25 अंकानी घसरुन निर्देशांक 29,893.96 वर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 43.45 अंकानी घसरुन निर्देशांक 8,748.75 वर बाजार बंद झाल्याचे दिसून आले.
दिवसभरात बाजारात जवळपास तीन तासाहून अधिक वेळ तेजीचा सिलसिला राहिला होता. परंतु अंतिम क्षणी ही तेजी टिकवण्यात बाजाराला यश मिळाले नाही. मंगळवारच्या अखेरच्या सत्रात मात्र मागील काही दिवसांपासूनची मरगळ झटकून टाकत बाजार सरसावल्याचे दिसून आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुंतवणूकदारांना बाजाराने चिंतेत पाडल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये बॅंकेच्या समभागांना घसरणीचा सामना करावा लागला आहे. यात सिटी युनियन बॅंक 1.83, आरबीएल बॅंक 3.44, स्टेट बॅंक 1.48, कोटक बॅंक 1.13, एचडीएफसी बॅंक 1.19 आणि ऍक्सिस बॅंकेचे समभाग 3.65 टक्क्यांनी घसरले आहेत.
करोनाची धास्ती कायम
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांनी काल केलेल्या कामगिरीमुळे जगातील विविध शेअर बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु जगातील करोना रुग्णांची वाढती संख्या, त्यातून वाढत जाणारे मृत्यू आणि त्याच्या धास्तीने पुन्हा जागतिक स्तरासह देशातील शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. परिस्थिती पाहता लवकरात लवकर करोनाला थोपविण्यासाठी जगातील देश एकत्रित येऊन मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. अन्यथा न भरुन निघणारे आर्थिक नुकसान जगाला सहन करावे लागणार आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहिली तर बाजारावरचा ग्राहकांचा विश्वास उडू शकतो.