नवी दिल्ली – जगभरातील हवाई प्रवाशासाठी सर्वोत्तम विमानतळ निवडण्यासाठी आधुनिकता, भव्यता आणि कार्यक्षमता लक्षात ठेवावी लागेल. भारतातही विमानतळांच्या विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. जगातील 100 सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत भारतातील चार विमानतळांचा समावेश झाला आहे.
स्कायट्रॅक्सने त्यांची जागतिक विमानतळ पुरस्कार 2022 यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चार भारतीय विमानतळांनी स्थान मिळवले असून ही देशासाठी एक सकारात्मक बातमी आहे. सर्वोत्तम 100 विमानतळांच्या यादीमध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे.
दिल्ली विमानतळ हे भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ असून या यादीत हे 37 व्या क्रमांकावर आहे. बेंगळुरू विमानतळ 61 व्या, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ 63 व्या, तर मुंबई विमानतळ 65 व्या क्रमांकावर आहे. हा पुरस्कार सोहळा 16 जून रोजी पॅरिस, फ्रान्समधील पॅसेंजर टर्मिनल एक्स्पो येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यात जगभरातील 500 हून अधिक विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, सांताक्रूझ आणि सहार उपनगरांमध्ये सुमारे 1450 एकर परिसरात पसरलेले आहे. मुंबईचे हे विमानतळ वर्षाला सुमारे अडीच कोटी प्रवाशांना सेवा देते.