प्रभात वृत्तसेवा
पुणे – करोनापाठोपाठ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढले होते. त्यामुळे आरोग्य विभागाची अक्षरश: झोप उडाली. एप्रिलपासून या आजाराचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, मागील दोन महिन्यांत हे प्रमाण लक्षणीय घटले आहे. एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
करोनातून बरे झालेल्या पण, प्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण होत आहे. विशेषत: ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्यांना हा संसर्ग होत आहे. हा आजार संसर्गजन्य नसला, तरी लागण झाल्यानंतर उपचार वेळेत घेतले नाही तर जीवघेणा ठरू शकतो.
ग्रामीणमध्ये एप्रिल महिन्यात म्युकरचे 11 रुग्ण सापडले, तर 6 जणांचा मृत्यू झाला. जूनमध्ये सर्वाधिक 44 रुग्ण सापडले तर 3 जणांचा मृत्यु झाला. आतापर्यंत ग्रामीण भागात एकूण 79 म्युकरचे रुग्ण सापडले असून, त्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 66 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 4 जणांवर उपचार सुरू आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता होती, मात्र ग्रामीणमध्ये एकही नवीन रुग्ण सापडला नाही. तसेच एकाही मृत्यूची नोंद न झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर संपूर्ण महिन्यात 5 रुग्ण सापडले. ऑगस्ट महिन्यातही 18 तारखेपर्यंत पाच रुग्णांची नोंद झाली आहे.
मात्र, या दोन महिन्यांत म्युकर मायकोसिसने एकही रुग्ण दगावला नसल्याची नोंद दिलासा देणारी आहे.