मानाच्या गणेश मंडळांचा निर्धार; धार्मिक परंपरा जपणार
पुणे – ढोल-ताशांचा गजर.. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी.. गुलालाची उधळण.. नेत्रदीपक सजावट असे दिमाखदार चित्र पुण्यात मिरवणुकांमध्ये पाहायला मिळते. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. याचप्रमाणे मिरवणुकादेखील रद्द करून “श्रीं’चे विसर्जन उत्सव मंडपात किंवा मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नागरिकांनी देखील घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे.
परंपरेप्रमाणे पुण्याचे प्रथम नागरिक महापौरांच्या हस्ते गणरायाला पुष्पहार अर्पण करतात, त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. यंदा देखील महापौर सकाळी 10:30 वाजता श्री कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करणार आहेत. आठ मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर गणरायांचे घरीच विसर्जन करावे किंवा महापालिकांनी तयार फिरत्या विसर्जन हौदात विसर्जन करावे.
– पुनीत बालन, उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट
आठ मंडळांच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचे देखील विसर्जन उत्सव मंडपात होणार आहे. सुशोभित हौदामध्येच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
विवेक खटावकर, अध्यक्ष तुळशीबाग गणपती मंडळ
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपतीचे विसर्जन छोट्या हौदामध्येच मंडपात होणार आहे. मंडळांनी घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, यामुळे करोनाचा प्रसार थांबविण्यासाठी देखील मदत होणार आहे.
– संजीव जावळे, अध्यक्ष, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट
तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी 12:15 वाजता होणार असून उत्सव मंडपातच होणार आहे. मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी एकत्र येत हा निर्णय घेतला असून, शहरातील गणेश मंडळांनी मंडपात आणि नागरिकांनी घरीच गणरायाचे विसर्जन करावे.
– राजाभाऊ टिकार, अध्यक्ष तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ
शासकीय नियमांनुसार, यंदा करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांनी घरातच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त मंडळांच्या वतीने केसरीवाड्यात लोकमान्यांना मानवंदना देणार आहोत.
– अनिल सकपाळ, पदाधिकारी, केसरीवाडा गणपती ट्रस्ट
शासनाच्या नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा होत आहे. भाविकदेखील ऑनलाइन दर्शनाला देखील प्रतिसाद मिळत आहे. मिरवणूक हा सोहळा असतो. पण, यंदा मिरवणूक रद्द केली आहे. गणपतीचे विसर्जन स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये मंडपातच करण्यात येणार आहे. प्रशासनावर ताण येऊ नये, यासाठी या हौदाची व्यवस्थादेखील मंडळे करणार आहेत. आपल्या मंडळाच्या जागी लाडक्या गणरायाचे विसर्जन करावे, असे सर्व मंडळांना आवाहन आहे. यंदाची परिस्थिती पाहून पुणेकरांनी आपल्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन घरातच करणे गरजेचे आहे.
– श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती मंडळ
दरवर्षीप्रमाणे गुलालाची उधळण होणार नसून, कार्यकर्ते केवळ टिळा लावणार आहेत. यंदा मंडळाच्या आवारात गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील त्याप्रमाणे घरातच विसर्जन करावे.
– पृथ्वीराज परदेशी, गुरुजी तालीम गणपती मंडळ
नागरिकांनी घरातच गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन नागरिकांनी करण्यात येत आहे. ज्यांना शक्य नाही, अशांनी फिरत्या हौदात विसर्जन करावे. सामाजिक भान ठेवत मंडळांनी हा निर्णय घेतला आहे.
– संजय मते, अखिल मंडई मंडळ