मुंबई : देशात एकीकडे काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावरील कारवाईने एकच गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राऊत यांच्यावर हक्कभंगाचा कारवाईचा चेंडू हा आता राज्यसभेत गेला आहे.
संजय राऊत यांच्यावरील कारवाई संदर्भात आता राज्यसभेतून अभिप्राय मागवण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी आजच हे प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असताना विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे.
खारदार संजय राऊत यांनी केलेल्या राज्यसरकारवरील टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्याच बरोबर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, हक्कभंगाचा कारवाईचा मुद्दा केंद्र सरकारकडे जाणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर आता यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच या प्रकरणावर राज्यसभेतुन नेमका काय अभिप्राय येतो हे पाहणे गरजेचे आहे.