हरितक्रांतीनंतर शेतीमध्ये संकरित बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. झटपट पीक मिळवण्याच्या हव्यासापोटी शेतकरी संकरित बियाणांचा अधिकाधिक वापर करू लागले. परंतु कालांतराने या बियाणांचे मानवाच्या स्वास्थ्यावर होणारे विविध दुष्परिणाम स्पष्ट होऊ लागले व या संकरित बियाणांमुळे होणारे नुकसान स्पष्ट झाले. “जुने ते सोने’ यानुसार आधुनिक शेतीमध्ये पूर्वीच्या बियाणांची साठवण-लागवड तेवढीच महत्त्वाची आहे हे स्पष्ट झाले. पारंपरिक-गावरान बियाणे वाणांच्या वापराकडे, जतनाकडे तसे दुर्लक्षच झालेले. मात्र एका निरक्षर महिलेने अशा पारंपरिक आणि गावरान वाण साठवण्याचे प्रयत्न केले हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
नगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे या महिलेने आपल्या जतन केलेल्या “देशी बियाणे बॅंके’त 52 पिकांचे 114 देशी वाण आहेत. कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना राहीबाईंनी केलेली ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कामाचा सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांना नुकताच “पद्मश्री’ पुरस्कार बहाल केला असून त्यांच्या ग्रामीण क्षेत्रातील या उल्लेखनीय कामाचा राष्ट्रीय स्तरावर या निमित्ताने यथोचित गौरव करण्यात आला.
राहीबाई यांचा जन्म 1964 मध्ये नगर जिल्ह्यातील कोंयाळणे या वनवासी गावात झाला. शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने राहीबाईंना शिक्षणापासून वंचितच राहावे लागले. मात्र त्या निसर्गाच्या सान्निध्यात व्यवहार्य शेती मात्र शिकल्या. लहानपणापासूनच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देशी वाणांच्या बियाणांचे संकलन करून त्याचा उपयोग शेतीकामी करण्याचा छंद सातत्याने जोपासला.
या छंदापायी अनेकांनी राहीबाईंना वेड्यात काढले. पण गावरान बियाणांचे संकलन करून त्याद्वारे शेती करण्याचा घेतलेला वसा त्यांनी टाकला नाही. पुढे धान्याच्या जोडीला भाजीपाल्याच्या बियाणांची त्यांनी जोड दिली. त्यातून देशी वाणांच्या धान्य- भाजीपाल्याचा प्रसार-प्रचार परिसरात वाढतच गेला. अनेकजण या कामी राहीबाईंचे सक्रिय अनुकरण करू लागले.
राहीबाईंनी देशी बियाणांसह शेतात भाजीपाला लावण्याचे काम गेली 20 वर्षे अखंडितपणे केले. सुरुवातीच्या टीका-टिप्पणीमुळे त्या डगमगल्या नाहीत. त्यांच्या याच प्रयत्नातून त्यांच्या कामाची दखल “बायफ’ या संस्थेच्या माध्यमातून सर्वदूर घेण्यात आली. एका जाहीर कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी राहीबाईंना “मदर ऑफ सीड’ म्हणजेच “बीजमाता’ अशी सार्थ पदवी बहाल केली.राहीबाईंनी गावरान वाणांच्या बियाणांची खास “बीज बॅंक’ सुरू केली. त्यासाठी त्यांनी शेकडो झाडे लावून गावरान बियाणांचे उत्पादन सुरू ठेवले.
– दत्तात्रय आंबुलकर