जामखेड : जामखेड नगरपरिषदेच्या वतीने बसवण्यात आलेले विविध चौकांतील दिवे नादुरुस्त तर त्यातील काही सुरू वा काही बंद असल्याने बहुतांश चौक अंधारात बुडून जात आहेत. बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे मात्र नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर नगरपरिषदेच्यावतीने महावितरणच्या विदयुत खांबावर नगरपरिषदेने दिवे उभे केले आहेत. शहरातील चौकांमध्ये तीन-चार रस्ते एकत्र येत असल्याने या भागात चांगला प्रकाश पडावा व वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून दिवे उपयुक्त ठरत होते.
मात्र, त्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने हे दिवे असून-नसून सारखेच झाले आहेत. काही चौकांत दिव्यांच्या पाच-सहा पॅनेलपैकी अवघे एक वा दोन सुरू आहेत. बाकीचे बंद असल्याने त्या दिव्यांच्या खालच्या भागात चक्क काहीसा अंधारच असतो. दुकाने बंद झाल्यावर अडचण बहुतांश रस्त्यांवर तसेच चौकांतून विविध व्यवसाय रात्री साडेनऊ-दहापर्यंत सुरू असतात.
विविध व्यावसायिक दालनांचा बराचसा उजेड रस्त्यांवर येत असतो. शिवाय रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या छोट्या-मोठ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांचा उजेड रस्ता उजळून टाकतो. पण रात्री व्यावसायिक दुकाने बंद झाल्यावर व रस्त्यावरील वाहनांचीही वर्दळ कमी झाल्यावर बहुतांश चौकांत जवळपास अंधाराचे साम्राज्य असते. अशा स्थितीत रस्त्यातील खड्डेचा अंदाज आला नाही तर वाहनचालकांची आदळआपट ठरलेली. अनेक मोठ्या चौकात एकच बल्ब बसविण्यात आला आहे. त्याचाही प्रकाश पडत नाही तर अनेक ठिकाणी बसविण्यात आलेले दिवे बंद पडले आहेत.
नगरपरिषदेच्या वतीने विदयुत साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा काढून खरेदी केलेले बल्ब नगरपरिषदेच्या विदयुत विभागाने कुठे लावले याचा थांगपत्ता लागत नाही. नागरिकांची तक्रार आल्यास सामान शिल्लक नाही तुम्ही खरेदी करा, आम्ही बसवून देऊ असे उत्तरे नगरपरिषदेचे कर्मचारी देतात त्यामुळे पथदिव्यांची नियमित दुरुस्ती गरजेची झाली आहे.