थंडी वाढल्याने नदीकाठच्या परिसरात वावर : सर्पमित्रांना संपर्क करण्याचे आवाहन
पिंपरी – दिवाळीपासून थंडीने जोर धरताच ऊब शोधण्यासाठी बाहेर पडलेले साप मोठ्या संख्येने सापडत आहेत. विशेषत: पवना आणि मुळा नदीच्या काठावरती वसलेल्या परिसरात साप आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. साप, वन्य जीव आणि प्राणी वाचविणाऱ्या एकाच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये शंभरहून अधिक साप सुरक्षित रित्या पकडले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पकडलेल्या सापांमध्ये सुमारे सत्तर टक्के साप हे विषारी आहेत.
नदी काठचा परिसर हा सर्पांचा अधिवास मानला जातो. साप हा शीत रक्ताचा प्राणी असल्याने जास्त थंडी त्यासाठी त्रासदायक ठरते. यामुळे जास्त थंडी पडल्यास सर्प ऊब शोधत बाहेर पडतात. अनेकदा हे साप अडगळीच्या ठिकाणी, बिछान्यांजवळ, वाहनांखाली, टायरजवळ बसतात. असे शंभरहून अधिक साप सांगवी येथील वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेने पकडले आहेत. हे साप जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी, खडकी या परिसरात आढळले आहेत.
या सापांमध्ये सुमारे सत्तर टक्के सर्प हे विषारी आहेत. त्यात सर्वाधिक संख्या ही घोणस या सापाची होती. त्या पाठोपाठ मण्यार, नाग हे विषारी सर्प सापडले आहेत. तर धामण, तस्कर, कवड्या, कुकरी, खापरखवल्या असेही साप सापडले आहेत.
थंडी वाढल्यामुळे अचानकच साप दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, सर्पमित्रांना संपर्क केल्यास ते सुरक्षित रित्या साप पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडतील. सापांना मारु नये, असेही आवाहन वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
इशारा देणारा घोणस
शहरात आढळलेल्या सापांमध्ये सर्वाधिक संख्या ही घोणसची आहे. तीन दिवसांपूर्वी केवळ बारा तासांमध्ये आठ घोणस साप आढळले होते. घोणस हा विषारी असला तरी तो दंश करण्याआधी मोठा फुत्कार सोडतो. म्हणून त्याला वॉर्निंग व्हिसल देणारा सापही म्हणतात. यामुळे अशा फुत्काराकडे लक्ष देऊन सावध होण्याची गरज असते.
सायलंट मण्यार
मण्यार हा साप ऊबीच्या शोधात अडगळ, बिछान्यांजवळ येतो. हालचाल झाल्यास हा दंश करतो. याचे दात लहान असल्यामुळे लवकर लक्षात येत नाही आणि बराच वेळ निघून गेल्यानंतर त्याच्या विषाचे परिणाम जाणवू लागतात.
स्टंटबाजी ठरतेयं घातक
शक्यतो सापाला छेडल्याशिवाय साप दंश करत नाही. यामुळे सापाला मारण्याऐवजी सर्तकता बाळगणे जास्त गरजेचे आहे. नव्याने तयार झालेल्या सर्पमित्रांना सापांची जास्त ओळख नसते. बिनविषारी कवड्या समजून ते मण्यारसारख्या विषारी सापाला निष्काळजीपणाने हाताळतात. अनेकदा सापांसोबत फोटो काढण्यासाठी, तिथे असणाऱ्या लोकांना इम्प्रेस करण्यासाठी उपकरणांऐवजी हाताने साप पकडण्याची स्टंटबाजी करतात. ही स्टंटबाजी घातक ठरते.
…पण वेळ आली नव्हती
वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस विनायक बडदे यांनी दैनिक प्रभात शी बोलताना सांगितले की दिवाळीच्या काळात थंडी वाढल्यामुळे अनेक साप आढळले. नवी सांगवी येथे मध्यरात्री एका हॉटेलमध्ये साप शिरताना दोन तरुणांना दिसला. त्यांनी गेट ठोठावून आतील कामगारांना उठविण्याचा प्रयत्न केला परंतु आतून प्रतिसाद आला नाही. अखेर त्यांनी सर्पमित्र बडदे यांना आणि हॉटेलच्या फलकावर असलेल्या नंबरवर फोन लावला. थोड्याच वेळात बडदे आणि हॉटेलचे मालक दोघेही त्याठिकाणी पोहोचले. मालकाने कामागारांना फोन करुन गेट उघडण्यास सांगितले. गेट उघडत असताना टॉर्च लावून पाहिले असता मण्यार सर्प हा कामगारांच्या अंथरूणापासून अगदी थोड्या अंतरावर पोहोचला होता. त्यावेळी सर्वांच्या तोंडातून निघाले काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
साप हा निसर्गचक्राचा समतोल साधण्यासाठी अत्यावश्यक आहे. यामुळे सापाला मारु नये, सर्पमित्रांना संपर्क करावा. शेतात व अडचणीच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना सर्पदंश होण्याचे प्रकार घडतात. स्वसंरक्षणासाठी अडचणीच्या ठिकाणी हात घालण्यापूर्वी लांब काठीने हालचाल करुन पहावी. अडगळीच्या ठिकाणी प्रवेश करणे गरजेचेच असल्यास हातात जाड कपड्याचे हातमोजे आणि पायात सेफ्टी शूज घालावेत. जोपर्यंत सापाला स्वत:च्या जीवाची भीती वाटत नाही तोपर्यंत साप दंश करत नाही, त्यामुळे साप आढळल्यास त्याला छेडण्या आणि मारण्याऐवजी सर्पमित्रांना (8657267925) संपर्क करावा.
– विनायक बडदे, सरचिटणीस, वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्था