नवी दिल्ली: दरडोई खर्चाच्या सरासरी प्रमाणात घट झाल्याच्या वृतावरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘मोदीनॉमिक्स’ने (मोदींचे अर्थशास्त्र) इतके नुकसान केले आहे की, आता सरकारला स्वतःचा अहवाल लपवावा लागत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
२०११-१२ मध्ये भारतातील एका व्यक्तीने सरासरी खर्च १५०१ रुपये केला होता, जो २०१७-१८ मध्ये ३.७ टक्क्यांनी घसरून १४४६ रुपयांवर आला आहे. याबाबत “मोदीनॉमिक्सने इतके नुकसान केले आहे की आता सरकारला स्वतःचा अहवाल लपवावा लागला आहे”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या अहवालानुसार दरडोई मासिक खर्चाच्या (एमपीसीई) आकडेवारी प्रत्यक्ष दृष्टीकोनातून २००९-१० ला आधार वर्ष म्हणून विचार करून या महागाईनुसार समायोजित केले होते.
२०११-१२ मध्ये एमपीसीई’त दोन वर्षांच्या कालावधीत १३ टक्क्यांनी वाढ झाली. कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही याच अहवालाचा संदर्भ देत मोदी सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले, नोटाबंदी आणि घाईघाईने जीएसटी लागू केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
Modinomics stinks so bad, the Govt has to hide its own reports. pic.twitter.com/mnXXBEQEFM
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 15, 2019